मुंबई, दि. २४ [प्रतिनिधी] :- ठरल्याप्रमाणे आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र पत्रकार परिषद घेवून आपल्या युतीची घोषणा अधिकृतपणे केली. यावरून राज्याचे उप-मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी “यांना यांची पोरं सांभाळता आली नाहीत, हे काय मुंबई सांभाळतील….?” असा चिमटा ठाकरे बंधूंना काढला.
पत्रकारांशी संवाद साधतांना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “काही युत्या शहराच्या, राज्याच्या, देशाच्या विकासासाठी असतात. जशी आमची महायुती आहे आणि काही युत्या ह्या आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी असतात. टक्केवारीच्या राजकारणासाठी गरज म्हणून करण्यात आलेल्या युत्या असतात. जशी ही ठाकरे बंधूंची युती आहे. यांना ना यांची मुले सांभाळता येतात, ना विरोधी पक्षाचे नेते म्हणून विरोधी पक्षाच्या भूमिका, जबाबदाऱ्या पार पाडता येतात. जर यांना जनतेच्या सुख-दुखांची जाणीव असती तर हे आत्ता झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये जनतेत जातांना दिसले असते. मुंबई महानगरपालिका म्हणजे, सोन्याची अंडे देणारी कोंबडी वाटते यांना. म्हणून हे एकत्र आले आहेत आणि मराठी माणूस हे ओळखून आहे. त्यामुळे यांना मुंबई महानगपालिका निवडणुकीत अपयश येणार. मराठी माणूस यांना घरी राहता, घरीच राहा म्हणनार.”
